आता शिक्षकांची होणार चारित्र्य तपासणी; विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण विभाग येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षक, प्रशासक, कर्मचारी, शिपाई यांची चारित्र्य पडताळणी करणार आहे. लवकरच त्याबाबत शाळांना आदेश देण्यात येतील, तसेच आदेशाची अंमलबजावणी कशी होते त्याकडे शिक्षण विभाग लक्ष देईल, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुधवारी औरंगाबाद दौऱ्यात स्पष्ट केले.

शिक्षण आयुक्त मांढरे हे शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी शहरात येतील, यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. कोणतीही पेंडन्सी नको यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर बुधवारी ते शहरात आढावा बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विविध विषयांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्द्यावर शाळांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना शिक्षण विभाग शाळांवर काय कारवाई करतो, असा प्रश्नही पालकांतून उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग शिक्षकांचे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करण्याचा विचार करत आहे. त्याबाबतची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होईल. त्याबाबतची स्पष्टता लवकरच होईल. नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होत असून त्यावेळीच हे बदल करण्यात येणार आहे.

खासगी शाळांमध्ये नव्या सत्रात शिक्षकांची नेमणूक होते. अशा वेळी तेथे नेमणूक करण्यात येणारा शिक्षक, त्याची इत्थंभूत माहिती संस्थेकडे असावी, त्याच्यावर काही पूर्वी गुन्हा दाखल नाही ना, याबाबत माहिती घेतली जाईल. शाळांमध्ये बसविण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत की नाही, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरही विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांनी करावा याबाबतही सूचना देण्यात येतील असे मांढरे यांनी सांगितले.

Sharing Is Caring:

Leave a Comment